
सतिश व्ही वानखडे
युवा महाराष्ट्र न्यूज संग्रामपूर प्रतिनिधी :
संग्रामपूर तालुक्यातील जिल्हा परिषद उर्दु उच्च प्राथमिक शाळेच्या परिसरात साचलेल्या पाण्यामुळे विद्यार्थ्यांच्या जीविताला गंभीर धोका निर्माण झाला आहे. शाळेच्या पटांगणात पंधरा ते सोळा सापाची पिल्ले तसेच अनेक मोठे साप आढळल्याचा आरोप पालक व ग्रामस्थांनी केला असून, याबाबत तातडीने उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली आहे.यासंदर्भात ९ जुलै २०२६ रोजी गटविकास अधिकारी, पंचायत समिती संग्रामपूर यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, शाळेच्या आवारात मोठ्या प्रमाणात पाणी साचत असल्याने सापांचा वावर वाढला आहे. त्यामुळे विद्यार्थी भीतीच्या वातावरणात शिक्षण घेत असून, कोणतीही दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
पालकांचा आरोप आहे की, वारंवार समस्या मांडूनही संबंधित प्रशासनाकडून कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष होत असल्याने पालकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.ग्रामस्थांनी प्रशासनाला इशारा देत म्हटले आहे की, शाळेतील साचलेले पाणी तातडीने काढून परिसर सुरक्षित करण्यात यावा. अन्यथा विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी गावकऱ्यांच्या व पालकांच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. एखादी अनुचित घटना घडल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित प्रशासनाची राहील, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे. विद्यार्थ्यांच्या जीविताशी संबंधित हा गंभीर प्रश्न असल्याने प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन शाळेचा परिसर सापमुक्त व सुरक्षित करावा, अशी मागणी पालक आणि ग्रामस्थांकडून जोर धरत आहे. निवेदन देता वेळी अनेक पालक वर्ग त्या ठिकाणी हजर होते .



