टुनकी-बावनबीर शेतशिवारात बिबट्याची दहशत ; सलग दोन दिवसात हरीण व काळवीटाची शिकार..
प्रादेशिक वन विभाग अधिकारी काळे यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला असता प्रतिसाद मिळाला नाही ,वन विभागाच्या कार्यक्षमतेवर शेतकऱ्यांचा संताप
( प्रभुदास पारस्कार ) :- युवा महाराष्ट्र11 न्युज
♦संग्रामपूर तालुक्यातील बावनबीर, टुनकी आणि सोनाळा शेतशिवार परिसरात बिबट्याच्या वाढत्या वावर व हालचालींमुळे शेतकरी शेतमजूर यांच्या मध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सोनाळा शेतशिवार आणि टुनकी शिवार येथे अवघ्या दोन दिवसांत सलगपणे हरिण व काळवीट या दोन वन्यप्राण्यांचा संशयित बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याची घटना 18 मार्च रोजी उघडकीस आली . प्राप्त माहितीनुसार, सोनाळा शिवारात विजय भगत यांच्या शेतशिवार परिसरात प्रथम हरिण मृतावस्थेत आढळले . त्यानंतर दुसऱ्याच दिवशी थोड्या अंतरावर टुनकी शिवारात राहुल पुंडे यांच्या शेतात काळविट मृतअवस्थेत दिसून आला . या सलग झालेल्या घटनांमुळे परिसरात बिबट्याचा वावर वाढल्याची भीती शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे. रात्रंदिवसशेतकऱ्यांना राबवण्याचा प्रयत्न करत आहेत . शेतांमध्ये पिकांना पाणी देण्याचे तसेच गहू, हरभरा, मक्का कापणी व मळणीची लगबग सुरू आहे . अशा परिस्थितीमध्ये या घटनांमुळे शेतकरी ,शेतमजूर व नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले असून, शेतात काम करताना जीवितास धोका निर्माण झाला आहे . विशेषतः सायंकाळनंतर व रात्रीच्या वेळी नागरिकांमध्ये भीती अधिक वाढत असल्याचे स्थानिकांनी सांगितले. दरम्यान, या घटनेबाबत माहिती देण्यासाठी वन विभाग अधिकारी निलेश काळे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला ; मात्र कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. अशा परिस्थितीमध्ये वन विभागाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे . शेती कामांची लगभग पाहता प्रशासनाच्या भूमिकेबाबत शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. या घटनेचे गांभीर्य पाहता वनविभागाने तातडीने घटनास्थळी पाहणी करून बिबट्याच्या हालचालींचा मागोवा घ्यावा, तसेच नागरिकांच्या सुरक्षेसाठी आवश्यक ती उपाययोजना करावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांसह शेतमजूर,शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.



